टीम इंडिया आगामी टी 20i वर्ल्ड कपआधी मायदेशात शेवटची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे. बीसीसीआय या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात काही बदल करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका स्टार खेळाडूचा टी 20i नंतर वनडे टीममधूनही पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या फलंदाजाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे बीसीसीआय या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीसीसीआय निवड समिती येत्या 3 किंवा 4 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे आणि टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय विकेटकीपर ऋषभ पंत याला वनडे सीरिजमधून डच्चू देण्याच्या तयारीत आहे. एकूणच कामगिरी आणि संतुलित संघाची बांधणी या 2 मुद्द्यांचा विचार करता पंतला वगळण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. उभयसंघात 11 ते 18 जानेवारी दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने पंतला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतूनही डच्चू दिला आहे.
पंतच्या जागी कुणाचा समावेश?आता पंतला वगळणार म्हटल्यावर त्याच्या जागी कुणाचा समावेश केला जाणार? हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पंतला वगळल्यास त्याच्या जागी इशान किशन याला संधी दिली जाऊ शकते. इशानने गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. इशानने त्याच्या नेतृत्वात टीमला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. तर आता इशान विजय हजारे स्पर्धेतही धमाका करतोय.
पंत दीड वर्षांपासून टीममधून आऊटपंतने जवळपास दीड वर्षांआधी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. पंत ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तसेच पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजचा भाग होता. मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे निवड समिती पंतबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
तर दुसऱ्या बाजुला इशान किशन याने अखेरचा एकदिवसीय सामना 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध खेळला होता. त्यानंतर इशान आता देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय. इशानने कॅप्टन म्हणून झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा किताब जिंकून दिला. इशानने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शतक ठोकलं. तसेच इशानने 24 डिसेंबरला अवघ्या 33 चेंडूसह विजय हजारे ट्रॉफीत वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज हा बहुमान मिळवला. इशानने या कामगिरीसह वनडे टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आहे.