टीम इंडियाचा वनडेमध्ये ऐतिहासिक पराक्रम! जागतिक क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिला संघ, आसपासही कोणी नाही
Marathi January 12, 2026 07:25 PM

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वडोदऱ्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 301 धावांचे आव्हान ठेवले होते. हे लक्ष्य भारतीय संघाने चार विकेट राखून आणि 49 षटकांत यशस्वीपणे पूर्ण केले. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये 300 हून अधिक धावांचे लक्ष्य 20 वेळा यशस्वीरीत्या गाठण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाला 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य 15 वेळांहून अधिक वेळा पूर्ण करता आलेले नाही. अशा परिस्थितीत भारत हा 20 वेळा 300+ लक्ष्याचा पाठलाग करणारा जगातील पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे. सध्या या बाबतीत भारताच्या आसपासही कोणताही संघ नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या विक्रमाच्या यादीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 15 वेळा 300 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. ऑस्ट्रेलिया 14 वेळा असा पराक्रम करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने 12 वेळा 300+ लक्ष्याचा पाठलाग केला असून तो चौथ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी 11 वेळा 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण केले असून ते संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध भारताने यशस्वीरीत्या पूर्ण केलेला हा दुसरा सर्वात मोठा रन चेस ठरला आहे. याआधी 2010 साली बंगळुरू येथे भारताने कीवी संघाविरुद्ध 316 धावांचे लक्ष्य गाठले होते. त्या सामन्यानंतर आता 301 धावांचे लक्ष्य पूर्ण करत भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा पाठलाग नोंदवला आहे.

पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडकडून ड्रॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स आणि कॉनवे यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला 50 षटकांत 8 विकेट गमावून 300 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात भारताकडून विराट कोहलीने 93 धावांची संयमी खेळी केली, तर कर्णधार गिलने 56 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जोरावर भारताने लक्ष्य सहज गाठले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.