Aditya Thackeray: मुंबईकरांचा धनशक्तीला नाकारून जनशक्तीला कौल, आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावले
esakal January 21, 2026 04:45 AM

मुंबई : ‘तुमच्याकडे सत्ता होती, पैसा होता, यंत्रणा होती आणि निवडणूक आयोगही होता. चार वर्षे प्रशासक बसवून तुम्ही मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला; पण मुंबईच्या जनतेने धनशक्तीला नाकारून जनशक्तीला कौल दिला आहे,’ अशा कडक शब्दांत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. ५४ नगरसेवक फोडूनही जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा निवडून दिल्याने हा निकाल म्हणजे गद्दारांच्या थोबाडीत लगावली गेलेली सणसणीत चपराक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.

आदित्य ठाकरेयांनी शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करताना कार्यकर्त्यांच्या कष्टाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, की ही निवडणूक साधी नव्हती. समोर बलाढ्य सत्ता आणि अमाप पैसा होता; पण मराठी आणि मुंबईचा सक्षम आवाज दाबण्याचा प्रयत्न फसला आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी पक्षासाठी आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवले, त्या सर्वांच्या ऋणात मी आहे.

Bus Fire: मुंबईत प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला आग, परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरनिशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, की त्यांनी आमचे ५४ लोक नेले; पण आज आमचे ६५ निवडून आले आहेत. हे आकडेच तुमची हार सिद्ध करतात.

‘मुंबईला कुणापुढे झुकवण्याचे प्रयत्न सुरू होते; पण आम्ही मुंबई त्यांच्या मालकासमोर ताठ मानेने उभी करू, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक संपली असली तरी महाराष्ट्र रक्षणाचा आमचा संग्राम थांबलेला नाही, तो आता अधिक जोमाने सुरू होईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी शेवटी दिला आहे.

Western Railway: रेल्वे प्रवाशांना दिलासा! कांदिवली-बोरिवली पाचव्या-सहाव्या मार्गिकेला हिरवा कंदील
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.