Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचं निधन… विमान मालकाचं म्हणणं काय? काय दिलं कारण?
Tv9 Marathi January 28, 2026 10:46 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून चार्टर विमानाने निघाले होते. लँडिंगदरम्यान या विमानाचा अपघात झाला आणि स्फोट होऊन विमानाला आग लागली. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. एकूण पाच जण होते – अजित पवार, त्यांचा सुरक्षा अधिकारी, एक सहकारी आणि दोन क्रू सदस्य (पायलट आणि सह-पायलट). अपघातानंतर विमान कंपनीवर तांत्रिक बिघाड आणि विमानाबाबत गंभीर आरोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विमान चालवणाऱ्या दिल्लीस्थित व्हीएसआर एव्हिएशन (VSR Aviation / VSR Ventures) चे मालक आणि डायरेक्टर व्ही. के. सिंह (विजय कुमार सिंह) यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

विमान पूर्णपणे ठिक होते – कंपनी मालक

व्ही. के. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना तांत्रिक बिघाडाचा संशय फेटाळला. ते म्हणाले, “आमच्या रेकॉर्ड आणि माहितीनुसार हे विमान (Learjet 45, रजिस्ट्रेशन VT-SSK) १००% सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा असे वाटत नाही.”

अपघाताचे संभाव्य कारण?

सिंह यांनी प्राथमिक माहितीवरून हवामानाच्या उल्लेख केला आहे. “लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात वातावरण स्वच्छ (visibility) नव्हते. धुके किंवा खराब हवामानामुळे पायलटला रनवे नीट दिसला नसावा. वैमानिक अनुभवी होते. मुख्य पायलटकडे १६,००० तासांहून अधिक उड्डाण अनुभव होता आणि सह-पायलटकडेही पुरेसा अनुभव होता. तरीही नेमके कारण DGCA आणि AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) च्या तपासणीनंतरच समजेल,” असे त्यांनी सांगितले.

DGCA आणि AAIB कडून तपास सुरू

केंद्र सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.