सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला, अजितदादांच्या लाडक्या पुतण्याची भावूक प्रतिक्रिया
गणेश लटके January 30, 2026 12:13 AM

Ajit Pawar plane crash :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधान झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बारामतीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा जनसागर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेल्याच्या भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला आहे. या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अजितदादांना अखेरचा निरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल बुधवारी बारामती विमानतळाजवळ धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान "अजितदादा अमर रहे" चा अखंड जयघोष करण्यात आल्या त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रमुख नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.  

प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात पोरका झालो असल्याची भावना

अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजितदादा या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे. सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत. 

अजितदादांच्या आठवणीने आख्खं मंत्रालय गहिवरलं, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावल्याच्या भावना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.