मुंबई : अजित पवारांच्या निधनानंतर (Ajit Pawar Plane Crash) सुरू झालेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं असतं असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
अजित पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते आणि 12 फेब्रुवारी रोजी ते जाहीर करणार होते असा दावा शरद पवारांच्या गटाकडून करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "समजा अजित पवार जर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेत असतील तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय घेतील का? चर्चा अंतिम स्टेजला गेली असती, तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. अशा प्रकारच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नाही. राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी."
अजित पवार अशी चर्चा करीत असतील तर ते सरकार मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? मी अनेक गोष्टी सांगू शकतो, पण मला यावर बोलायचे नाही. अजित पवार आणि मी दोन तास बोलत बसलो होतो, तशी कोणतीही माहिती मला त्यांनी दिली नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांच्या पक्षाने निर्णय घेतला, सुनेत्रा ताईंनी नेतृत्व करावे त्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत उभे राहणे हे आमचं काम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे ही अजित पवारांची इच्छा होती, त्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला. तसेच खुद्द शरद पवारांनीही तसा दावा केला आहे.
आता देवेंद्र फडणीसांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता."