धर्म–संस्कृतीचा दीप ठाण्यात उजळला
esakal February 02, 2026 01:45 PM

धर्म, संस्कृतीचा दीप ठाण्यात उजळला
त्रिमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

ठाणे, ता. १ (बातमीदार) : धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या, शांततेच्या आणि विश्वकल्याणाच्या एकाच ध्येयाकडे नेतात, हा संदेश देणाऱ्या ठाण्यातील भव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने शहरात धार्मिक एकता आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू झाला, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी-विधान आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या वेळी जैन समाजासह विविध धर्मांचे नागरिक, मान्यवर आणि देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला.
या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, की हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. अहिंसा, सत्य, आत्मशुद्धी आणि मानवकल्याण हीच सर्व धर्मांची समान मूल्ये असून, त्रिमंदिर त्या मूल्यांचा संदेश देते. तसेच विविध धर्म, पंथ आणि विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर समाजात शांतता, एकोपा आणि नैतिक मूल्ये दृढ करते, असेही त्यांनी नमूद केले. त्रिमंदिरात एकाच छताखाली सीमंधर स्वामीजी, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि शिवलिंग विराजमान असून, या अनोख्या संकल्पनेमुळे प्रत्येक भाविकाला ‘हे माझेच मंदिर आहे’ अशी भावना निर्माण होते, असे शिंदे यांनी सांगितले. या मंदिरामुळे ठाणे शहराची ओळख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्रासोबतच आध्यात्मिक केंद्र म्हणूनही अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादा भगवान यांच्या प्रेरणेतून आणि दादा भगवान फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराचा उद्देश विज्ञानाच्या माध्यमातून शांती, एकता आणि शाश्वत आनंदाचा प्रसार करणे हा आहे. प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवक आणि भाविकांचेही या वेळी कौतुक करण्यात आले.


सोयी-सुविधांसाठी शासन कटिबद्ध
भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि इतर सोयी-सुविधा पुरविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले. ठाण्यातून विश्वशांतीचा संदेश दूरवर पोहोचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.