Ajit Pawar Plane Crash : हवामान क्लिअर असताना विमान… अजित पवार यांच्या विमान अपघातावर माजी गृहमंत्र्यांकडून शंका
Tv9 Marathi February 02, 2026 07:45 PM

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या मृत्यूवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. विमानाचा अपघात कसा झाला? कागदपत्र जळाली नाहीत, माणसं कशी जळाली? विमानात सहा जण होते. त्यातील सहावी व्यक्ती कुठे आहे? अशा अनेक शंका या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे अपघात नेमका कसा झाला यावर सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही या अपघातावर शंका व्यक्त करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

अजितदादांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली आहे. तुम्हाला या अपघाताबद्दल काय वाटतं? असा सवाल अनिल देशमुख यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनीही शंका उपस्थित केली. अनेक लोकं शंका व्यक्त करत आहेत. इतके हवामान क्लिअर असताना अशा पद्धतीने विमान एकदम टिल्ट (कलंडलं) कसं झालं? जेव्हा व्हिडीओ क्लिअर येतो तेव्हा व्हिजिबिलिटीचा प्रश्न राहू शकत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे, अशी प्रतिक्रिया देत अनिल देशमुख यांनीही शंका उपस्थित केली आहे. आता शेवटी अपघाताची चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू झाल्यावर त्यातून संपूर्ण बाबी पुढे येतील, असंही ते म्हणाले.

संवादातून समोर येईल

विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. रिपोर्ट आल्यावर एक्झॅटली काय घडलं ते माहीत पडेल. पायलट आणि को पायलटमध्ये काय संवाद झाले हे स्पष्ट होईल. त्यातूनच अपघाताची नेमकी कारणे समोर येतील, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दहा दिवस थांबा…

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. काही लोक अशी चर्चा झाली नसल्याचं नाकारत आहेत. त्यावरही देशमुख यांनी भाष्य केलंय. अजित पवार यांचं दु:खद निधन झाल्याने दुखवटा आहे. दुखवट्याचा काळ झाल्यावर विलिनीकरणाबाबत काय काय घडलं? काय नाही घडलं? कोणत्या तारखेला मिटिंग झाल्या? यावर सविस्तर बोलू. दहाव्या दिवशी मी बोलणार आहे. सर्व व्यवस्थित सांगणार आहे. कोणत्या वेळेस मिटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली. किती वेळ चालली. काय काय ठरलं सर्व सविस्तर सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्व सांगू

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायचं असतं तर अजितदादा माझ्याशी बोलले असते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी आम्ही सर्व सांगू. कुणाशी बोलणं झालं? काय झालं? किती वाजता झालं? कोण कोण होतं? सर्व सांगू, असं उत्तर त्यांनी दिलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.