तात्या लांडगे
सोलापूर : उजनी धरणातून सध्या शेतीसाठी डावा व उजव्या कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. शेतीसाठी सोडलेले पहिले आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांना उजनीच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी मिळणार आहे.
सोलापूर शहराला उजनीचाच मोठा आधार असून दरवर्षी सोलापूरसाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जायचे. पण, समांतर जलवाहिनी झाल्याने यंदा तशी वेळ येणार नाही. त्यामुळे सुमारे १५ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात एक आवर्तन ज्यादा मिळणार आहे. आता १७ जानेवारी रोजी सोडलेले आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. त्यानंतर मार्चअखेर दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
कडक उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातील पाण्याची स्थिती पाहून मे महिन्यात तिसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतील पाण्याचे नियोजन होणार आहे. त्यात शेतीच्या पुढील दोन आवर्तनांचे नियोजन अंतिम होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धरणात ११५ टीएमसी पाणी (९६ टक्के) असून त्यात ५१ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
मार्च व मे महिन्यात भीमा नदीत पाणी
सोलापूर शहरासाठी दरवर्षी तीन ते चारवेळा भीमा नदीतून सोडले जात होते. त्यामुळे नदी काठावरील गावांना व जनावरांसह शेतीला मोठा आधार होता. आता समांतर जलवाहिनीमुळे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांची व गावांची मोठी पंचाईत झाली आहे. पण, उन्हाळ्यात म्हणजेच मार्च व मे महिन्यात गरज पाहून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते. त्याचेही नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.