बिर्ला महाविद्यालयात नवसाहित्यिकांचा सन्मान
esakal February 04, 2026 08:45 AM

बिर्ला महाविद्यालयात ‘नवसाहित्यिक सन्मान’
१,५८७ निबंधांमधून ६९ विजेत्यांची निवड
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे पुरस्कृत ‘साहित्य भारती प्रांत’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण प्रांतातील नवलेखक व साहित्य अभ्यासकांसाठी आयोजित सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कोकण प्रांतातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ही त्रिस्तरीय व त्रिभाषिक (मराठी, हिंदी, इंग्रजी) निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये १२७ शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता, तर १,५८७ निबंध आले होते. यातून ६९ विद्यार्थी विजेते ठरले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे, जयपूरचे प्रसिद्ध साहित्यिक इंदुशेखर तत्पुरुष यांनी स्पर्धेच्या विषयांवर (पर्यावरण संरक्षण, विकसित भारत २०४७ आणि आत्मनिर्भर भारत) भाष्य करत विद्यार्थ्यांमधील वैचारिक प्रगल्भतेचे कौतुक केले.
गृहरक्षक दलाचे सहा. संचालक, विजयकुमार कलवले यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलवर केवळ ''स्क्रोल'' करण्यापेक्षा ''स्कॉलर'' बनण्याकडे लक्ष द्यावे. असे म्हटले. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी नवसाहित्यिकांसाठी असे कार्यक्रम दिशादर्शक असून, महाविद्यालयातर्फे यासाठी नेहमीच सहकार्य मिळेल, असे म्हटले. तर डॉ. बलिराम गायकवाड व दुर्गेश सोनार यांनी साहित्याची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि साहित्यातील नैतिकतेवर भर दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेशप्रताप सिंह यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.