U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...
esakal February 07, 2026 12:45 AM

शुक्रवारी (६ फेब्रुवारी) १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना हरारेमध्ये भारत आणि इंग्लंड संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमी शतकी खेळी केली आहे.

आता या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर इंग्लंडला ४११ धावा करण्यापासून थांबवण्याचे आव्हान भारतासमोर आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल, तर इतिहास घडवावा लागणार आहे. कारण अद्याप इतके मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या स्पर्धेच्या इतिहासात झालेला नाही.

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सलामीला ऍरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी उतरले होते. पण चौथ्याच षटकात जॉर्जला ९ धावांवर ऍलेक्स ग्रीनने बेन मायेसच्या हातून झेलबाद केले. पण नंतर वैभवला कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ मिळाली. त्यांनी शतकी भागीदारीही केली.

या दरम्यान दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. तसेच आक्रमक खेळताना वैभव शतकाजवळ पोहचला होता. मात्र अर्धशतकानंतर आयुष १९ व्या षटकात बाद झाला. त्याला ऍलेक्स ग्रीननेच बेन मायेसच्या हातून झेलबाद केले. आयुषने ५१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या. वैभव आणि आयुष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली.

त्यानंतर वैभवला वेदांत त्रिवेदीचीही साथ मिळाली. वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो अत्यंत आक्रमक खेळू लागला. त्याने ७१ चेंडूतच दीडशतक पूर्ण केले होते. तो द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता.

मात्र २६ व्या षटकात त्याला मॅनी लम्लडेनने थॉमस ऱ्यूच्या हातून झेलबाद केले. वैभवने १५ चौकार आणि १५ षटकारांसह ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. ही अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी आहे.

तो बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यातही ५१ धावांची भागीदारी झाली. मात्र विहान ३६ चेंडूत ३० धावा करून जेम्ल मिन्टोच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेदांतही ३२ धावांवर मिन्टोच्याच गोलंदाजीवर बाद झाला.

तरी नंतर अभिग्यान कुंडूने आक्रमक ३१ चेंडूत ४० धावांची खेळी केली. आरएस आंब्रिशने १८ धावांची खेळी केली. खिलान पटेल ३ आणि हेनिल पटेल ५ धावांवर बाद झाले.

U19 World Cup: ८ षटकार, ८ चौकार अन् शतक... वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध वादळ घोंगावलं! फायनलमध्ये रचले तीन मोठे विश्वविक्रम

पण कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. कनिष्क चौहान २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जेम्स मिन्टोने ३ विकेट्स घेतल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लम्सडेनने १ विकेट घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.