-जि. प. शाळा दुरुस्तीसाठी हवेत पावणेनऊ कोटी
esakal February 07, 2026 07:45 AM

डिजिटल शिक्षण, मोडक्या इमारती
जिल्हा परिषदेच्या २२८ शाळांची अवस्था; दुरुस्तीसाठी पावणेनऊ कोटींची गरज, नियोजनाकडे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना ‘डिजिटल झळाळी’ प्राप्त झाली आहे. मात्र इमारतींची अवस्था सध्या बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे २२८ प्राथमिक शाळांच्या इमारती नादुरुस्त आणि धोकादायक असून, त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेतून आठ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांमुळे या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला असून, अनेक शाळांनी ‘डिजिटल’ झळाळी प्राप्त केली आहे; मात्र, एकीकडे तंत्रज्ञानाची कास धरली जात असताना दुसरीकडे मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे शाळा दुरुस्तीचा सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. सध्याच्या आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर या प्रस्तावावर वेगाने हालचाली होणे अपेक्षित आहे. शाळा व्यवस्थापन समित्या आणि पालकांकडून वारंवार होणाऱ्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, काही शाळांनी लोकसहभागातून डिजिटल साधने मिळवली असली तरी मूळ इमारतींच्या गळती आणि भिंतींना गेलेल्या भेगांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती पुढे येत आहे.
----
चौकट
शाळांच्या कामांची सद्यःस्थिती
* (२०२५-२६) : ४६ नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी ५ कोटी ४७ लाख रुपये मंजूर.
* (२०२५-२६) : ६९ शाळांच्या डागडुजीसाठी ४ कोटी ५२ लाख रुपये मंजूर.
* जिल्ह्याभरात अजूनही २२८ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.