पिंपरी, ता. ६ ः बिजलीनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. मंडळातील ज्या सभासदांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालीत अशा नऊ जोडप्यांचा पुनर्विवाह करण्यात आला. या प्रसंगी सर्व जोडप्यांनी आनंदाने उखाणे घेऊन उपस्थितांचे मनोरंजन केले.
चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यास प्रत्येकाच्या कुटुंबातील मुले, मुली, सुना, जावई, नातू उपस्थित होते. प्रत्येक विवाहीत जोडप्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. विवाह प्रसंगी मंडळाच्या वतीने सुग्रास भोजन देखील ठेवण्यात आले होते.
पहिल्या सत्रात संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ यांनी आयोजित ‘इंडियन म्युझिकल क्लब’ प्रस्तुत अनिल झोपे व सहकारी यांचा ‘गाता रहे मेरा दिल’ या गाण्यांचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या सत्रात सामाजिक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय कुळकर्णी व कविता दळवी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संघाच्या ‘क्षितिज’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
किसन चौधरी, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, आशा सूर्यवंशी, शैलजा मोरे, पल्लवी वाल्हेकर, कविता दळवी यांचा सत्कार करण्यात आला. आयोजन अशोक भंगाळे आणि वाल्मीक शर्मा यांनी केले.
यावेळी महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ, जयवंत भोसले, अनुराधा चैतन्य, शालिनी थोरवे, आशा पाटील आदींसह इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुराधा चैतन्य यांनी केले. आभार दिलीप पानसरे यांनी मानले.