विख्यात अभिनेते विनोद खन्ना यांचं तगडं फॅन फॉलोईंग होतं. यशाच्या शिखरावर असताना त्यांनी संन्यास घेतला, मात्र काही काळाने ते पुन्हा चित्रपटसृष्टीत कार्यरत झाले. त्यांच्या संन्यासाबद्दल बरचं काही बोललं गेलं आहे. आता विनोद खन्ना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी , त्यांच्या पतीबद्दल, विनोद खन्ना यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल काही गोष्टी उघड केल्या असून, त्या खूप व्हायरल झाल्या आहेत. कविता यांनी त्याच्या यूट्यूब चॅनलवर विनोद खन्ना यांच्या ओशोच्या आश्रमातील दिवसांचा उल्लेख केला आहे.
विनोद खन्ना यांचा अध्यात्मिक प्रवास
अभिनेता विनोद खन्ना यहे जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हाच त्यांनी अभिनयाचं जग सोडलं. ते ओशोंच्या आश्रमात माळी म्हणून काम करत होते. विनोद खन्ना यांनी अचानक तो निर्णय का घेतला, हे कविता खन्ना यांनी उघड केलं. आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या की ते (विनोद) लहानपणापासूनत खूप अध्यात्मिक होते.
जेव्हा ते 17 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी एका योगीचे आत्मचरित्र विकत घेतले आणि वाचले, ज्यामुळे त्यांचा अध्यात्माकडे कल आणखी वाढला. कविता पुढे म्हणाल्या की, विनोद खन्ना यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि ओशोंच्या आश्रमात गेले. त्या म्हणाल्या, “त्या अद्वितीय जीवनाचा त्याग करण्याचा त्याचा अंतिम निर्णय – ते अद्भुत भौतिक जीवन, लोकांचे प्रेम आणि आदर आणि इतके प्रचंड यश. दोन वर्षांत कुटुंबातील अनेक मृत्यूंनंतर त्यांचा (विनोद खन्ना) निर्णय झाला. म्हणून, जेव्हा त्यांची आई गेली, तेव्हा ते थेट ओशोकडे गेले आणि संन्यास घेतला” असं कविता यांनी सांगितलं.
‘ ते ओशो यांच्याकडे माळी म्हणून काम करत होते. त्यांचं घर खूप खासगी होतं, आणि तिथे जायची फार कमी लोकांना परवानगी होती. पण जर तुम्ही माळी असाल, तर तिथे रहायची परवानगी होती. ही त्यांची सेवा होती. ओरेगनमध्ये, ओशोंनी त्यांच्यासाठी खास डिझाइन केलेल्या मोठ्या रोब्सचा ( गाऊन सारखं वस्त्र) संग्रह केला होता. ते सर्व प्रथम विनोदवर वापरून पाहण्यात आले, कारण त्यांचे खांदे सारखेच होते.’ अशी आठवण कविता यांनी सांगितली.
किती अध्यात्मिक होते विनोद खन्ना ?
कविता खन्ना यांनी पुढे एका आठवणही सांगितलं. गिरगाव चौपाटीवर न्यूड मेडिटेशन ( विवस्त्रावस्थेन ध्यानधारणा) आयोजित करण्यात आलं होतं, त्यांनी (विनोद) त्या सेशनमध्ये भाग घेतला होता, असं त्या म्हणाल्या. जेव्हा ते मुंबईत राहत होते, तेव्हा (पुण्यातील आश्रमात जाण्यापूर्वी) ते चौपाटी बीचवर ध्यान करायचे. मुंबईतील चौपाटी बीच हा खूप गर्दीचा समुद्रकिनारा आहे. तिथे लोकं कपडे काढून, न्यूड होऊन एका वर्तुळात बसून मेडिटेशन, ध्यान करायचे.. मला माहित्ये की, विनोद तिथे कोणत्याही शारीरिक कारणासाठी गेला नव्हता. त्याचा प्रवास पूर्णपणे आध्यात्मिक होता, तो खोल भक्ती आणि समर्पणाने भरलेला होता’, अशी आठवण कविता खन्ना यांनी सांगितली.
विनोद खन्ना यांनी त्यांच्या जवळजवळ 50 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं. राजकारणी म्हणूनही त्यांनी यश मिळवले. 2020 साली आलेल्या “गन्स ऑफ बनारस” चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. हाँ चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी प्रदर्शित झाला होता. 2017 मध्ये कर्करोगामुळे विनोद खन्ना यांचं निधन झाले.