IND vs PAK : खेळायचं आहे तर खेळा नाही, तर…! आयसीसीने पाकिस्तानच्या 3 अटी फेटाळून लावल्या
GH News February 09, 2026 11:12 PM

IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासून सुरू असलेला ड्रामा अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यापासून जे काही सुरू झाले आहे, ते 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार यात काही शंका नाही. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने साखळी फेरीत आमनेसामने येणार हे निश्चित होतं. 15 फेब्रुवारी हा सामना नियोजित आहे. पण या सामन्यापूर्वीच बरंच काही घडलं. बांगलादेशने भारतात खेळण्यास, तर आयसीसीने वेळापत्रक बदलण्यास नकार दिला. त्यानंतर बांगलादेशची जागा स्कॉटलँडने घेतली. बांगलादेशला वगळल्याने पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला. खरं तर राजकीय पोळी शेकण्यासाठी भारताविरूद्धचा सामना खेळणार नसल्याचं जाहीर केलं. आयसीसीकडून पाकिस्तानला हा सामना खेळण्यासाठी वारंवार विनवणी केली जात आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. असं असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा सामना खेळण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत.

आयसीसीने मेंबर पार्टिसिपेशन करारानुसार आणि डिसेंबरब 2024 मध्ये झालेल्या हायब्रिड होस्टिंग मॉडेलच्या दाखला देत पाकिस्तानला सामना खेळण्यास सांगितलं आहे. पण पीसीबीने या दरम्यान आयसीसीवर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्याची मागणी ठेवली आहे. इतकंच काय तर या तीन देशात ट्राय सिरीजचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी हँडशेक करावं. तसेच आयसीसीकडून पाकिस्तानला जास्त मानधन मिळावं अशा मागण्या ठेवल्या आहेत.

पाकिस्तान आणि बांगलादेशच्या किती मागण्या आयसीसीने मान्य केल्या हे स्पष्ट नाही. पण आयसीसी भारतविरुद्ध द्विपक्षीय मालिका, ट्राय सिरीजची हमी घेऊ शकत नाही. कारण याबाबतचा पूर्ण अधिकार बीसीसीआयकडे आहे आणि बीसीसीआय भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे. दुसरीकडे, भारताचा नियोजित बांग्लादेश दौराही होणं कठीण दिसत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या मागण्यांना आयसीसी भीक घालेल असं वाटत नाही. त्यामुळे पाकिस्तानला थोडी लाज असेल तर खेळणार नाही. पण भीकेला लागलेल्या पाकिस्तानला आर्थिक फटका बसू नये असं वाटत असेल तर खेळेल. आता त्या दिवशी पाकिस्तान काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआय या प्रकरणावर मौन बाळगून आहे. भारत मल्टिनॅशनल स्पर्धेत तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहे. मौन बाळगून बीसीसीआयने पाकिस्तानची नाचक्की केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.