हिंजवडी-माण गटात भाजपचे शिवाजी पाटील विजयी
esakal February 10, 2026 06:45 AM

हिंजवडी, ता. ९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हिंजवडी-माणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश आले. जिल्हा परिषदेच्या गटात भाजपचे शिवाजी बुचडे पाटील यांनी विजय मिळवीत पक्षाचे वर्चस्व राखले. दुसरीकडे पंचायत समितीच्या हिंजवडी गणात भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे, तर माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा बाबाजी शेळके विजयी झाल्या.
या जिल्हा परिषद गटात एकीकडे आयटी पार्क, वेगाने होणारे शहरीकरण आणि ग्रामीण भागाचा संगम आहे. बुचडे पाटील यांनी प्रचारात विकास, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक समस्यांवर लक्ष केंद्रित केले. ग्रामीण तसेच शहरी मतदारांचा विश्वास मिळवीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. स्थानिक नेत्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसले. दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून पारंपरिक मतदारसंघातही प्रभाव कमी झाल्याचे दिसले.
आजी-माजी आमदारांनी हा गट अतिशय प्रतिष्ठेचा केला होता. बुचडे पाटील यांनी अनेक वर्षापासून सामाजिक कामात सातत्य राखले. गावातील उमेदवार म्हणून त्यांना मारुंजीतुन पाठिंबा मिळाला. हिंजवडीतील नातेवाईक माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांच्यामुळे माण गणात त्यांना फायदा झाला. रिहे खोऱ्यात वाढलेली पक्षाची ताकद, युवानेते सुरेश हुलावळे, तानाजी हुलावळे, वसंत साखरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची साथ त्यांच्या कामी आली. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर व सत्ताधारी ग्रामपंचायत कमिटीची साथही मोलाची ठरली.

ग्रामपंचायत एकजुटीचा विजय
हिंजवडी गणात भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे यांनी युवा चेहरा, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम प्रचार केला. महिलांच्या प्रश्नांसह पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्या म्हणून असलेला जनसंपर्क, जनतेची केलेली कामे, पक्षाची ताकद त्यांच्या कामी आली. सरपंच गणेश जांभूळकर यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने स्वतःची निवडणूक म्हणून एकजुटीने जबाबदारी घेतली. कमिटीच्या सदस्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत आक्रमक प्रचार केला. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

मंदा शेळके यांच्यामुळे राष्ट्रवादीची सरशी

माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा बाबाजी शेळके यांनी पारंपरिक मतदारांचा आधार, स्थानिक संपर्क आणि ग्रामस्थांशी असलेली थेट नाळ याच्या जोरावर बाजी मारली. ग्रामीण प्रश्न आणि मूलभूत सुविधांचे मुद्दे तसेच आमदार शंकर मांडेकर यांचा प्रभावही निर्णायक ठरला. शेळके दांपत्य अनेक वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय आहे. मंदा यांचे पती बाबाजी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तसेच पिंपळोली गावचे माजी उपसरपंच आहेत. मंदा या पिंपळोली ग्रामपंचायतच्या माजी सदस्या आहेत. त्यामुळे दोघांचाही जनसंपर्क दांडगा आहे. बाबाजी यांनी गेल्या अनेक वर्षापासून आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी राबविलेल्या आरोग्य शिबिरांचा ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना लाभ झाला आहे.
भाजपचे कमळ चिन्ह असलेल्या युगंधरा पारखी यांना पक्षाने निलंबित करून रूपाली बोडके या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले. त्यामुळे मतदारांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला. यामुळे विभागलेल्या मतांचा थेट फायदा शेळके यांना झाला. या निकालातून हिंजवडी-माण परिसरातील मतदारांनी विकास आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
-----

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.