खरंच नो हँडशेक! भारत पाकिस्तान वादावर दिग्गजाने केला खुलासा, बंद दरवाजा आड काय घडतं?
GH News February 20, 2026 06:16 PM

IND vs PAK, No Handshake Policy: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय तर क्रिकेटच्या मैदानातही याचे पडसाद उमटले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करत नाही. आशिया कप स्पर्धेपासून असंच चित्र आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत जेव्हा भारत पाकिस्तान आमनेसामने आले, तेव्हाही नो हँडशेक पॉलिसी कायम असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पाठ फिरवली. तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाही तसाच निघून गेला. असं असताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकने भारत पाकिस्तान दरम्यान नो हँडशेक पॉलिसीबाबत एक मोठं विधान केलं आहे. एलिस्टर कुकच्या मते मैदानात हात मिळवणी न करणे ही एक दिखावा आहे. कारण खेळाडू बंद दरवाजा आड चर्चा करतात.

एलिस्टर कुकने ‘स्टिक टू क्रिकेट‘ या पॉडकास्टमध्ये मायकल वॉन, डेविड लॉयड आणि फिल टफनेल यांच्याशी चर्चा करताना हा दावा केला. एलिस्टर कुकने सांगितलं की, ‘खेळाडू बंद दरवाजा आड चर्चा करत नाही का? बोलत नाहीत का? मी कुठे तरी वाचलं होतं की, प्रत्येक जण बोलत आहे. असं वाटते की हा फक्त दिखावा आहे. नाही का? खरं सांगायचं तर ते फक्ट मैदानात हात मिळवणी करत नाहीत. पण बंद दरवाजा आड सर्व काही करत आहेत आणि सर्व काही ठीक आहे. ‘ दरम्यान, हातमिळवणी करत नसल्याने मायकल वॉनने नाराजी व्यक्त करत सांगितलं की, क्रिकेट मैदानात हात मिळवणी न करणं दुखद आहे.

एलिस्टर कुकच्या मते, खरं तर खेळाडूंमध्ये काहीच वैर नाही. त्याचं हे विधान भारत पाकिस्तान सामन्यानंतर चर्चेत आलं आहे. भारत पाकिस्तान यांच्यात सुपर 8 फेरीत तर सामना होणार नाही. त्यामुळे हातमिळवणी तसा काहीच प्रश्न नाही. पण दोन्ही संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत भिडू शकतात. जर तसं समीकरण जुळून आलं तर.. पण तेव्हाही नो हँडशेक पॉलिसी कायम असेल का? हा देखील प्रश्न आहे. कारण भारताने आशिया कप स्पर्धेत हा पवित्रा कायम ठेवला होता. त्यानंतर महिला क्रिकेटमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. अंडर क्रिकेटमध्येही हाच कित्ता गिरवला गेला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.