टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी लढती होणार आहे. सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना टी20 वर्ल्डकप 2024 उपविजेत्या दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा उपांत्य फेरीच्या दिशेने सामना सुकर होणार आहे. असं असताना अभिषेक शर्माच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. कारण या स्पर्धेत त्याला खातंही खोलता आलेलं नाही. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. वर्ल्ड नंबर 1 फलंदाजाची अशी स्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत काहीच वाटत नाही. उलट प्रतिस्पर्धी संघांना अभिषेक शर्माची भीती घालत आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘अभिषेक शर्माच्या फॉर्मची चिंता जे लोक करत आहेत. मला त्यांची चिंता वाटत आहे. मला त्या संघांची चिंता आहे जे अभिषेकचा सामना करणार आहेत. मागच्या वर्षात त्याने सर्व काही केलं. आता आमची पाळी असून त्याचे उपकार फेडायचे आहेत.’ टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्मा टीम इंडियाची ताकद मानली जात होती. पण साखळी फेरीतील त्याच्या कामगिरीने प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि शून्यावर बाद झाला. नेदरलँडविरुद्धही तसंच झालं.
एका महिन्यात अभिषेक शर्मा 8 टी20 सामन्यापैकी 5 सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे चिंता तर वाटणारच.. दुसरीकडे, संजू सॅमसनही फॉर्मात नाही. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. असं असलं तरी भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. आता सुपर 8 फेरीत खरी कसोटी आहे. कारण येथे तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे. उपांत्य फेरीसाठी भारताला किमान दोन सामने जास्त नेट रनरेटने जिंकावे लागणार आहेत.