मानधनाबाबत वृद्ध कलावंतांची पदरी उपेक्षा
शेकडो प्रस्ताव लालफितीत; कलावंतांमध्ये नाराजी, ३१ मार्चपूर्वी निर्णय गरजेचा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे कला आणि साहित्यसेवेसाठी अर्पण करणाऱ्या वृद्ध कलावंतांच्या पदरी सध्या उपेक्षाच पडताना दिसत आहे. ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजने’अंतर्गत जिल्ह्यासह राज्यातील अनेक प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ३१ मार्चची अंतिम मुदत तोंडावर असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे या ज्येष्ठ कलावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी वृद्ध साहित्यिक व कलावंतांकडून प्रस्ताव मागवले होते; मात्र, या प्रस्तावांची छाननी आणि त्यानंतर होणारी निवड समितीची बैठक यामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. नियमानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्चपूर्वी लाभार्थ्यांची निवड करणे बंधनकारक आहे. जर या काळात निर्णय झाला नाही तर हे प्रस्ताव पुढील वर्षाच्या चक्रात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वी या योजनेअंतर्गत ‘अ,’ ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणींमध्ये मानधन दिले जात असे; मात्र, मार्च २०२४ मध्ये शासनाने या नियमांत सुधारणा केली. आता श्रेणी पद्धत रद्द करून सर्व पात्र वृद्ध कलावंतांना सरसकट पाच हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचा निर्णय घेतलाआहे. ही रक्कम कलावंतांच्या उतरत्या वयातील औषधोपचारांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष संपायला अवघा सव्वा महिना शिल्लक राहिल्याने आता जिल्हा प्रशासकीय स्तरावर वेगवान हालचाली होणे गरजेचे आहे. जर वेळेत निवड झाली नाही तर अनेक गरजू वृद्ध साहित्यिक आणि कलाकार हक्काच्या मानधनापासून वंचित राहू शकतात.
-----
चौकट
पण नव्या निवडीचे काय?
एक सकारात्मक बाब म्हणजे जुन्या लाभार्थ्यांचे मानधन जानेवारी २०२६ पर्यंत बँकखात्यात जमा झाले आहे. पूर्वी यासाठी तीन-चार महिने वाट पाहावी लागत होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे; मात्र, नवीन प्रस्तावांची गाडी ‘छाननी’ आणि ‘समिती निर्णया’च्या स्थानकावरच थांबलेली आहे.