संतांची शिकवणच देईल युवा पिढीला दिशा
इंद्रजित देशमुख; काेळेत संभाजी मानेंना वारकरी भूषण पुरस्कार
कोळे, ता. २३ ः सध्याची पिढी वेगळ्या वाटेवर जात असताना भरकटली आहे. घृणा, राग, द्वेष आणि मत्सर त्यांच्या सदैव डोक्यात आहे. त्यांना पटकन राग येतो, त्या भरात नको त्या गोष्टी करतात. मात्र, संतांनी दिलेली शिकवणच युवा पिढीला यातून बाहेर काढू शकते. त्यासाठी ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
वैकुंठवासी नामदेव शिंदे महाराज यांच्या स्मृतीनिमित्त यंदाचा वारकरी भूषण पुरस्कार रेठरे बुद्रुक येथील संभाजी माने यांना देण्यात आला. येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देशमुख यांच्या हस्ते त्यांना गौरविले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘प्रत्येक मनुष्यजीव इच्छेच्या सागरात बुडाला आहे. इच्छा पूर्ण झाली नाही तर तो उद्विग्न होतो. वाईट दिशेला जातो; परंतु पसायदान सांगते, जो स्वतः उद्विग्न होत नाही आणि दुसऱ्याला उद्विग्न करत नाही तो खरा आनंदमय जीवन जगतो. जीवनात आवश्यक असणारे परिवर्तन कशासाठी असावे, ते ज्ञानेश्वरांनी पसायदानातून सांगितले आहे. त्याचे आजच्या पिढीला पठण होणे गरजेचे आहे.’’
बापूसाहेब माने उखळीकर, मोहन भोसले, राहुल पाटील- पार्लेकर, पालखी चालक ज्ञानेश्वर शिंदे, प्रतिभा शिंदे, कृष्णत शिंदे, वैशाली शिंदे, कुटुंबीयांसह दिंडीचे सदस्य, आरेवाडीचे श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, तुळसणची गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था व रामिष्ठेवाडी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, मल्हारपेठ संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सदस्य, कापील व दुशेरे वारकरी सांप्रदायाचे स्नेही उपस्थित होते. राजेंद्र चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. कृष्णत शिंदे यांनी आभार मानले.
B02206
कोळे ः संभाजी माने यांना वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करताना इंद्रजित देशमुख. त्या वेळी बापूसाहेब माने, मोहन भोसले, राजेंद्र चव्हाण, मारुती जाधव आदी. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------