Sanjay Raut : एपस्टीन फाईल्समधून जो माल मसाला बाहेर येणार आहे, तो रोखण्यासाठीच…संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
Tv9 Marathi February 25, 2026 04:45 PM

राज्यसभेसाठी मविआत शरद पवार यांच्या नावावर एकमत होतय का? “एक प्रक्रिया असते. एक जागा मविआला मिळणार असेल तर काँग्रेस, एनसीपी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील. मग, त्यात बातमी काय आहे. विधान परिषद, राज्यसभा आहे. दोन्ही बाबींवर एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. त्या दृष्टीने आमदारांची एकत्र बैठक घेणं, नेत्यांनी चर्चा करणं या गोष्टी ओघाने आलच. या निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात द्विवार्षिक निवडणुकीची तयारी सुरु आहे. कारण साधारण 36 जागा देशभरात रिकाम्या होत आहेत. महाराष्ट्रात सात जागा, महायुतीकडे 6 जागा निवडून आणण्याचं बळ आहे. आम्ही एक जागा निवडून आणू शकतो” असं संजय राऊत म्हणाले.

“काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. कुणी एकच निवृत्त होत नाहीय, काँग्रेसच्या रजनी पाटील निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहेत. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी म्हणून आपला मत व्यक्त करतो शेवटी जाणार एक उमेदवार. आता तो उमेदवार कोण यावर तीन पक्षांमध्ये चर्चा आहे. एक मात्र नक्की, माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही” असं संजय राऊतम्हणाले.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का?

उमेदवार शरद पवार असतील तर निवडणूक बिनविरोध होणार का? “हे मी कसं काय सांगणार. मूळात शरद पवार यांच्या उमेदवारीवर मविआत चर्चा होईल. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता इच्छा व्यक्त करतो मी एक संधी घेणार आहे, त्यावर तीन पक्षात चर्चा होईल मग आम्ही पुढे जाऊ” असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्या एनसीपीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होईल या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “अजितदादा आज आपल्यात नाहीत अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वपदी सुनेत्रा पवार आल्या आहेत. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षाची धुरा कोण संभाळणार हे त्यांचा पक्ष ठरवेल”

मुंडवा जमीन प्रकरणाच विषय संपलेला नाही

पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याला अंजली दमानिया विरोध करतायत. त्यावरही संजय राऊत बोलले. “पार्थ पवार यांच्या संदर्भात उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाच विषय संपलेला नाही. मुख्यमंत्री पाठिशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय द़़डपले जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुलं असती तर हा विषय पुढे गेला असता. सत्ताधारी एकत्र आहेत, कायद्यापुढे सगळ समान नाहीत हे सिद्ध होते”

अजितदादांच्या शोकसभेत पहिल्यारांगेत हास्य विनोद सुरु होते

व्हीएसआरच्या विमान उड्डाणांवर काल डीजीसीएने बंदी घातली त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “हा रोहित पवार यांच्या लढाईचा लहानसा विजय आहे. यापुढे मोठी लढाई लढतील असं मला दिसतय. आज आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत. कुठेतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर मी जे वातावरण शोकसभेत पाहिलं. पहिल्यारांगेत हास्य विनोद सुरु होते. त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवार यांच्या मृत्यूच रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे”

उरलेला भारत अमेरिकेला विकून टाकला ते ही गौतम अदानीसाठी

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी योग्य ठरवलं. “मोदी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हापासून भारत गौतम अदानीला विकला. उरलेला भारत अमेरिकेला विकून टाकला ते ही गौतम अदानीसाठी. राहुल गांधी खरं बोलतायत. भारत मातेला विकून टाकलं उद्योगपती मित्रांसाठी. एपस्टीन फाईल्समधून जो माल मसाला बाहेर येणार आहे तो रोखण्यासाठी भारताला विकून टाकलं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.