Ravi Shastri : भारताच्या पराभवामुळे मी खुश… रवी शास्त्री यांच्या विधानाने क्रिकेट जगात खळबळ, चाहतेही हैराण
Tv9 Marathi February 25, 2026 04:45 PM

टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026 ) मध्ये भारताच्या (Team India) विजयाचा वारू अखेर दक्षिण आफ्रिकेने रोखला. सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात भारतला दक्षिण आफ्रिकेकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता भारतीय संघ सेमीफायनलमध्ये तरी पोहोचतो की नाही याची चिंता क्रिकेटप्रेमींना सतावत आहे. मात्र याच दम्यान टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि भारतीय संघाटे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या एका विधानामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुपर-8मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून बार मिळाली, या पराभवामुळे मी खुश आहे, असं ते म्हणाले. हा झटका भारतासाठी गरजेचा होता, असंही त्यांनी नमूद केलं.

अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 111 धावांवर गारद झाला. या अत्यंत लाजिरवाण्या पराभवामुळे भारताच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र असं असलं तरी रवी शास्त्री खुश आहेत. यामागचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारत्या पराभवामुळे का खुश रवी शास्त्री ?

सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियावर खूप दबाव आहे. आता सेमीफायनल गाठणं हे भारतासाठी सोपं नाही. मात्र असं असलं तरी सूर्या आणि भारतीय संग पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीतही प्रवेश करेल , अशी आशा रवि शास्त्री यांनी व्यक्त केली. आयसीसी रिव्ह्यू प्रोग्राममध्ये ते बोलत होते. ” मला आनंद आहे की हे (पराभव)इतक्या लवकर घडलं, विशेषतः अशा संघाविरुद्ध जो उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. भारतासाठी हा धक्का आवश्यक होता. त्यामुळे त्यांना भविष्यात त्यांच्या रणनीती आणि संघ रचनेचा पुनर्विचार करावा लागू शकतो. पण ते नक्की पुनरागमन करतील याचा मला विश्वास आहे. या (पराभवाच्या) अनुभवावरून त्यांनी योग्य तो धडा घेतला असेल आणि आता ते कोणालाही हलक्यात घेणार नाहीत” असंही शास्त्री म्हणाले.

अक्षर पटेला बाहेर बसवणं गंभीर-सूर्याची चूक ?

सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू, अक्षर पटेलला बाहेर बसवण्यात आलं होतं. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी वॉशिंग्टन सुंदरवर पैज लावली होती, मात्र ती अपयशी ठरली. याबद्दल बोलताना शास्त्री यांनी सुचवलं की, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अक्षरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा आणि गरज पडल्यास त्याला वॉशिंग्टनसोबत खेळवावे.

“मला वाटतं की संघ व्यवस्थापनाला अक्षर पटेलला परत आणण्याची गरज आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास दोन्ही गोलंदाजांना खेळवण्याचा सल्ला मी देतो, त्यामुळे तुमच्याकडे एक अतिरिक्त पर्याय आहे, कारण एखाद्या दिवशी, काही गोलंदाज खराब कामगिरी करू शकतात.” असंही माजी प्रशिक्षक पुढे म्हणाले. “उदाहरणार्थ, वरुण चक्रवर्ती काल सर्वोत्तम कामगिरीत करू शकला नाही आणिता आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. म्हणूनच बॅकअपची आवश्यकता आहे” असंही त्यांनी नमूद केलं.

26 फेब्रुवारीला टीम इंडियाचा झिम्बाब्वेशी मुकाबला

सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, टीम इंडिया पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. आता त्यांचा पुढला सामना, उद्या म्हणजेच गुरूवार, 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झिम्बाब्वेशी होणार आहे. सिकंदर रझाच्या संघासाठीही हा सामना महत्त्वाचा आहे, कारण त्यांना मागील सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झिम्बाब्वे भारताविरुद्ध भारतात खेळणार आहे. मार्च 2002 मध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.