अनिवार्य `वंदे मातरम''चा निर्णय महापौरांनी टाळला
esakal February 25, 2026 04:45 PM

अनिवार्य ‘वंदे मातरम्’चा निर्णय महापौरांनी टाळला
नगरसेविका अर्चना मणेरा यांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ठाणे महापालिकेच्या प्रत्येक महासभेत सहा कडवी असलेले संपूर्ण राष्ट्रीय गीत वंदे मातरम् घ्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली होती. या मागणीबाबत महापौरांनी सोमवारी (ता. २४) झालेल्या महासभेत चर्चा टाळली. तसेच विषय प्रलंबित ठेवल्यामुळे नगरसेविका अर्चना मणेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हा एक मंत्र झाला. त्याने स्वातंत्र्यानंतरही लाखो भारतीयांना प्रेरणा दिली. भारतीयांमध्ये नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण केला. यापुढील काळातही ‘वंदे मातरम्’ हा आपल्या भारतीयांचा एक महत्त्वाचा प्रेरणास्रोत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने वंदे मातरमबद्दल नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य आहे. ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात व नागरिकांच्या दृष्टिकोनातून महासभा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ गीताला मानवंदना देण्यासाठी व ठाणेकरांना प्रेरणा देण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक महासभेत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत वाजविण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केली आहे. याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याबरोबरच महापालिका सचिव मनीष जोशी यांना पत्र पाठवून २३ फेब्रुवारीच्या महासभेपासून ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्याची आग्रही मागणी केली होती, परंतु या विषयावर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना आठवण करून देऊनही चर्चा टाळून निर्णय न घेतल्यामुळे अर्चना मणेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.