औकिब नबीवर सौरव गांगुली: रणजी ट्रॉफी 2025-26 च्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या दोन संघांमध्ये ऐतिहासिक लढत रंगली आहे. हुबळी येथील केएससीए क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या या सामन्यात जम्मू-काश्मीरचा दबदबा दिसून येत आहे. प्रथमच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणारा जम्मू-काश्मीर संघ इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. पहिल्या डावात मोठी आघाडी घेत त्यांनी विजेतेपदाकडे पाऊल टाकले आहे.
या सामन्यात जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी पुन्हा एकदा चमकला. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेत कर्नाटकच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघ्यावर आणले. त्याच्या भेदक माऱ्यामुळे कर्नाटकचा डाव 293 धावांवर आटोपला. आकिबने 23 षटकांत 54 धावा देत 5 बळी घेतले. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात तब्बल 584 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे त्यांना आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही त्यांनी 60/2 अशी सुरुवात करत कर्नाटकवर दबाव कायम ठेवला आहे.
गांगुलीने अकीब नबीचे कौतुक केले
आकिब नबीच्या दमदार कामगिरीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सोशल मीडियावरून त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी बीसीसीआय आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना टॅग करत आकिबच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचे आणि त्याला टीम इंडियात संधी देण्याची आपील केली. गांगुली यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीरने जगाला दाखवून दिले की जिद्द आणि प्रयत्न काय साध्य करू शकतात. आकिब नबी टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात झळकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याची सुरुवात इंग्लंड दौऱ्यापासून व्हावी.”
आकिब नबीची कामगिरी…
आकिब नबीचा हंगाम जबरदस्त ठरला आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये त्याने 60 बळी घेतले असून तो या हंगामातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याच्या नावावर 151 विकेट्स घेतले आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 36 डावांत 56 बळी, तर टी20 प्रकारात 24 डावांत 43 बळी घेत त्याने आपली अष्टपैलू क्षमता दाखवून दिली आहे. एकूणच, आकिब नबी सध्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असून त्याची टीम इंडियाकडे वाटचाल आता अधिक वेगाने होताना दिसते आहे. जम्मू-काश्मीरसाठी तो केवळ गोलंदाज नाही, तर आशेचा किरण ठरला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा