Marathi actress rescued from Dubai: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता भारतालाही बसू लागले आहेत. मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं इस्राईल आणि इराणमधील युद्धामुळे हवाई वाहतुकीवर मोठे परिणाम झाला असून अनेक नागरिक प्रदेशात अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अनेक भारतीय तसेच मराठी कलाकार अडकून पडले आहेत. हा तणाव दिवसागणिक वाढत चालला आहे. युद्धाच्या या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकरही (Smita Gondkar) परदेशात अडकली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath SHinde) यांच्या कॉलनंतर अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिच्यात झालेल्या बोलण्याची क्लिप जोडली आहे. या पोस्टमध्ये तिने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टची सध्या एकच चर्चा आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने तिचा मुलगा अभिनय कुवेतमध्ये अडकल्याचं एका व्हिडिओमधून सांगितलं होतं. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कॉलनंतर मुलाला लवकरच इकडे आणू असा आश्वासनही त्यांनी दिलेलं.
अभिनेत्री स्मिता गोंदकरने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेन सोबत व्हिडिओ कॉल वर बोलताना दिसतेय. दुबईत गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या परिस्थितीचा आढावाही तिने तिच्या या पोस्टमध्ये दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही क्षेपणास्त्रे डागताना हल्ले होताना पाहत असल्याचं तिने एकनाथ शिंदे यांना सांगितलं. त्यावर तातडीने मायदेशी परतण्याची व्यवस्था करायला सांगितल्याचे त्यांनी कळवले. नंतर अभिनेत्री सुखरूप परत आली असून तिने एक पोस्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत.
View this post on Instagram
ती म्हणाली,"गेल्या काही दिवसांचा काळ आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. मोठमोठे स्फोटांचे आवाज, खिडक्या हादरवणाऱ्या कंपनांपासून ते रात्री आकाशात उडणारी क्षेपणास्त्रे, त्यांना अडवण्याच्या कारवाया आणि खाली पडणारा अवशेष हे सगळं आम्ही जवळून पाहिलं. दिवसा देखील आकाशात लहान ढगांसारख्या संरचना दिसत होत्या. परिस्थिती लवकर शांत होईल आणि आम्ही लवकरच घरी परतू, अशी आशा आम्ही सतत ठेवत होतो. मात्र हवाई क्षेत्र बंद असल्याने आणि दररोज फ्लाइट्स रद्द होत असल्यामुळे, वारंवार बुकिंग करूनही परतीचा मार्ग मिळत नव्हता. माझ्यासोबत कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकही असल्यामुळे घरी परतणं जवळजवळ अशक्यच वाटू लागलं होतं.
अशा वेळी माननीय उपमुख्यमंत्री Eknath Shinde, श्री मंगेश देसाई आणि अतिरिक्त आयुक्त राहुल घेथे यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सतत मदत केली. आमच्यासाठी राहण्याची व्यवस्था, प्रवासासाठी पिकअप आणि भारतात सुरक्षित परत येण्यासाठी समन्वय या सर्व बाबतीत त्यांनी दिलेली मदत खरोखर दिलासा देणारी होती. त्यांच्या जलद निर्णयांमुळे आणि सहकार्यामुळे केवळ माझे कुटुंबच नव्हे, तर तिथे अडकलेले अनेक भारतीय सुरक्षितपणे मायदेशी परतू शकले. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांसाठी तत्परतेने उभे राहणारे नेतृत्व पाहून खूप अभिमान वाटतो.या सर्व मदतीसाठी मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करते. भारत सरकार आणि आपल्या लोकांसाठी उभं राहणारं नेतृत्व पाहून भारतीय असल्याचा अभिमान अधिकच वाढतो. असं ती म्हणालीय.