टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनची बॅट काही चालली नाही. साखळी फेरीत एक संधी मिळाली त्यातही खास करू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. त्यात सुपर 8 फेरीच्या करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाची नाजूक स्थिती होती. वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण संजू सॅमसनने जबरदस्त खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर संजू सॅमसनच्या वडिलांची एक मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीत सॅमसन विश्वनाथ यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. पण असं का? संजू सॅमसनचे वडील का रडले? संजू सॅमसनच्या वडिलांनी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळीनंतर हा व्हिडीओ दिला होता. मुलाच्या कामगिरीनंतर त्यांना अश्रू अनावर झाले. कारण संजू सॅमसनच्या खेळीमुळे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली होती.
सॅमसन विश्वनाथ यांनी सांगितलं की, वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यादिवशी पहिल्या चेंडूपासून सामना पाहत होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत उठले नाहीत. इतकंच काय तर कोणाचा फोनही उचलला नाही. फक्त आपल्या मुलाचा खेळ पाहिला. सॅमसन विश्वनाथ पुढे म्हणाले की, पहिल्यांदा देवाकडे काही मागितलं होतं. त्याची लाज राख आणि एक दिवस दे. मुलाखतीत असं असताना सॅमसन विश्वनाथ यांना रडू कोसळलं. ही व्हिडीओ क्लिप आता व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होत असल्याने दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल काही लागला आणि वाटेला काही आलं तरी चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. संजू सॅमसनने या सामन्यातही चांगली खेळी करावी आणि संघाला संकटातून बाहेर काढवं अशी अपेक्षा आहे. संजू सॅमसन प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही.