महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे विकसित महाराष्ट्र 2027 या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना म्हणून जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचीही व्यवस्था अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. या घोषणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीस मोठा मार्ग प्रशस्त होईल.