पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
वैभव बोडके March 07, 2026 07:43 PM

Jayakumar Gore :  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. यानंतर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपला मिळावं , यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं आहे. 

सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळं अध्यक्षपद भाजपलाच मिळावं

साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंत्री गोरे यांनी मैदानावर तुफान फलंदाजी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगत जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपलाच मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की अध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे. अजून खूप पाणी पुलाखालून जायचे आहे. पुढील काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. मात्र भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

गोरेंचे काळे कारनामे, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, साडी चोळीचा आहेर देत सोलापुरात महिला काँग्रेस आक्रमक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.