मी थ्री इडियट्समधील रँचो, तर पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे…; देवेंद्र फडणवीसांची तुफान बॅटिंग, पीके आणि गजनीबद्दल विचारताच…
Tv9 Marathi March 11, 2026 11:45 AM

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक परिसरात नुकतंच एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने ही मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गंभीर राजकीय चर्चेसोबतच मिश्किल टिप्पणीही करण्यात आली. त्यामुळे सध्या याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

या मुलाखतीच्या शेवटी आमिर खानने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक रंजक खेळ खेळला. आमिर म्हणाला, मी माझ्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. मी आता तुम्हाला माझ्या चित्रपटांतील काही गाजलेल्या पात्रांची नावे सांगतो, तुम्ही रोज अनेक राजकीय नेत्यांना भेटता, तर त्या पात्राचा स्वभाव कोणत्या नेत्याला साजेसा आहे हे तुम्ही सांगायचे, असे आमिर खानने म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत एक अटही घातली. या खेळात मला लाईफलाईन पण हवी आहे, असे म्हटले.

देवेंद्र फडणवीसांची खास शैलीत उत्तरं

यानंतर आमिरने एक-एक नाव घेण्यास सुरुवात केली. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. ‘लगान’मधील संकटातही गावाला एकत्र बांधून ठेवणारा आणि जिद्दीने लढणारा भुवन कोण? असे विचारले असता यावर फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न लावता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. तर कयामत से कयामत तक मधील राज या रोमँटिक पात्रासाठी त्यांनी आपले सहकारी गिरीश महाजन यांचे नाव घेतले.

यानंतर त्यांना ‘थ्री इडियट्स’मधील कल्पक आणि हुशार रांचोच्या भूमिकेबद्दल विचारले असता, त्यांनी स्वतःचेच नाव घेतले. तर सरफरोशमधील देशप्रेमी आणि करारी पोलीस अधिकारी एसपी राठोड या भूमिकेसाठी त्यांनी स्वतःचेच नाव निवडले. तर दंगलमधील महावीर सिंग फोगट या शिस्तप्रिय आणि जिद्दी बापू, रंग दे बसंती चे डीजे, तारे जमीन पर मधील निकुंज सर या भूमिकांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले.

राजकीय परिस्थितीवर बोट

पण यावेळी काही पात्रांच्या बाबतीत मात्र फडणवीसांनी नाव न घेता गुपित राखणे पसंत केले. रंगीलामधील ‘मुन्ना’ कोण? या प्रश्नावर त्यांनी हे मी तुम्हाला एकट्यात सांगेन असे म्हणत खोचक टिप्पणी केली. तर दिल चाहता है मधील आकाश या पात्राबद्दल बोलताना त्यांनी कितीतरी लोकांनी आमचा विश्वास तोडला आहे, असे विधान करत राजकीय परिस्थितीवर बोट ठेवले.

या कार्यक्रमाच्या अगदी शेवटी आमिरने पीके मधील एलियन आणि गजनी मधील सिंघानिया (ज्याला विसरण्याची सवय असते) ही पात्रे कोणाला लागू होतात? असे विचारले. यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही एकमेकांकडे पाहून केवळ एक मिश्किल हास्य केले. आम्ही तुम्हाला हे नाव नंतर सांगू, असे उत्तर देत त्यांनी राजकीय सस्पेन्स कायम ठेवला. या उत्तराने संपूर्ण परिसरात एकच हशा पिकला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.