नाशिकमधील भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. अशोक खरातचे काळे धंदे उघडत होत आहेत. ही सर्व प्रकरणे पाहून अनेकांनी अशोक खरातला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आता धाराशिव येथे एका खाजगी कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना “भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत” असा धमकीपूर्ण सूर ठेवला. या वक्तव्याने धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, “अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत. चुकीची कृत्ये करणाऱ्याला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, लोकांनीच एखाद्याला महाराज बनवले असते, पण जर असे महाराज धर्माला कलंक लावत असतील तर ते पापी आहेत.
महाराजांनी धर्मकार्य आणि पैसे याबाबतही मत व्यक्त केले. “धर्मकार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नयेत असा कोणताही नियम किंवा बंधन नाही,” असे ते म्हणाले. हे वक्तव्य अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आले असून, जिथे खरातने अंकशास्त्र, दैवी शक्ती आणि उपचारांच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप आहे. खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, SIT तपास सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणासह अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असून, महाराजांच्या या वक्तव्याने या प्रकरणाला नवे राजकीय-धार्मिक वळण मिळाले आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांच्या कारनाम्यांविरोधात जनजागृतीची गरज अधिक तीव्र होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरात यांच्यावर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले. आता या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असून, या पथकाच्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.