राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामध्येच काही जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवसात उष्णता वाढण्याचे दाट संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचाही येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. परभणी, ब्रह्यपुरी, वर्धा, अमरावती आणि अकोला येथे पारा 40 च्या पार जाताना दिसला. सोलापूर, वाशिम येथे 39 अंशाच्या आसपास तापमान नोंदवले गेले. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती हीच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाबाहेर पडताना काळती घ्यावी. अती महत्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा. गडचिरोली, गोदिंया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल.
मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत मराठवाड्यातील काही भागात हजेरी लावताना दिसत आहे. आज मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा काही भागात हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
अकोल्यात गेल्या नऊ दिवसांपासून 36 ते 39 अंशांदरम्यान स्थिर असलेले तापमान अचानक वाढले असून पारा 41.08 अंशांवर पोहोचला होता. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी रस्त्यांवरही मोठा सुकसुकाट बघायला मिळाला. नागरिका उन्हात घरात राहणे पसंत करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली, शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
उन्हाचा तीव्र कडाका सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम सुरू असताना या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले.