मुंबई : अशोक खरात (Ashok Kharat) अघोरी पूजा करतोय हे माहिती असतं तर मी त्याच्याकडे कधीच गेलो नसतो, मी साईभक्त आहे. या प्रकरणात संजय राऊतांच्या कंपूकडून आपल्याला बदनाम केलं जात असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि शिंदेंचे आमदार दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) दिली. अशोक खरातच्या कोणत्याही कृत्यात आपला सहभाग नाही, कोणत्याही महिलेची त्याच्याशी ओळख करून दिली नाही, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणाशी आपला संबंध जोडला जात आहे तो राजकीय द्वेषाने. ज्यावेळी शिवसेनेमध्ये संघर्ष पेटला होता, त्यावेळी आपण एकनाथ शिंदेंची बाजू महाराष्ट्रासमोर आणली. त्यामुळे ठाकरे गटाचा आपल्यावर राग आहे. त्या रागापोटी बदनाम केलं जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केला. मी साईबाबांचा भक्त आहे, त्यामुळे कुठलीही अघोरी पूजा किंवा कृत्य करत नाही असं केसरकरांनी म्हटलं.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खरातसोबत माजी मंत्री दीपक केसरकरांचा फोटो समोर आला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने केसरकरांवर आरोप करण्यात आले. दीपक केसरकर हे अशोक खरातचे पार्टनर होते असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या सगळ्या आरोपांवर आता दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, "अशोक खरातला अटक होईपर्यंत मला त्याच्या कृत्याची माहिती नव्हती. एखाद्याचा फोटो सोबत असणं म्हणजे त्याच्या वाईट कृत्यात सहभागी असणं असं नाही. मी अशोक खरातच्या कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी नाही. अशोक खरातला वाचवण्यासाठी मी कुठल्याही पोलीस स्टेशनला फोन केला नाही. कुठल्याही महिलेची मी त्यांच्याशी ओळख करून दिली नाही. महिलांबाबत त्याने केलेल्या कोणत्याही कृत्याबाबत मला माहिती नाही."
अशोक खरात प्रकरणात आपल्यावर चुकीचे आरोप केले जात असून आपल्या मतदारसंघात महिलांना पैसे देऊन विरोधात मोर्चे काढण्यात आले, असा आरोप केसरकरांनी केला. सार्वजनिक जीवनात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला. संजय राऊत आणि त्यांच्या कंपूने जे काही राजकीय षडयंत्र रचलं आहे ते कधीही यशस्वी होणार नाही. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे. त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरवू, असं ते म्हणाले.
ईशानेश्वर मंदिर हे शिर्डीपासून 10 किमीवर आहे. त्यामुळे एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या ठिकाणी गेलो असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं. ते म्हणाले की, "श्रद्धा हा वेगळा भाग आहे आणि जादूटोणा हा वेगळा भाग आहे. मी कुठल्याही प्रकारच्या अघोरी विधीमध्ये भाग घेतला नाही. अशोक खरातने त्याच्या ज्योतिषाच्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवलं. त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे."
ही बातमी वाचा: