चाकण, ता. ३० : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव प्रतिकिलो आठ ते १२ रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या निम्म्याहून कमी बाजारभाव मिळत असल्याने राज्य सरकारने तातडीने ‘बाजार हस्तक्षेप योजना’ (एमआयएस) लागू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा निर्यात ठप्प झाली असून, याचा मोठा फटका शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना बसला आहे. मशागत, लागवड आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा भावात ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने ‘एमआयएस’ योजनेच्या अटी पूर्ण होत आहेत.
सरकारने खरेदीदार म्हणून बाजारात उतरल्यास भावात स्थिरता येईल आणि शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नाशिक, अहिल्यानगर आणि चाकण या प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भावात मोठी घसरण झाली आहे. केंद्राची योजना उपलब्ध असतानाही राज्य सरकारने अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. सरकारने ही योजना तातडीने राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे गजानन गांडेकर आणि सुभाष पवळे यांनी केली आहे.