आजही तो कोसळणार! तब्बल इतक्या जिल्ह्यात हवामान विभागाचा मोठा इशारा, धोक्याची घंटा..
Tv9 Marathi April 06, 2026 10:45 AM

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाचा मोठा फटका बसत आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. आज विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका वाढण्याचीही शक्यता आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात नीचांकी 15.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोदिंया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18 हजार शेतकऱ्यांचे पिकाचं नुकसान झाले. साक्री शिंदखेडा शिरपूर धुळे तालुक्यातील 234 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान. एकून 11627 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

5 हजार 900 हेक्टर कांदा, 2 हजार 400 हेक्टर ज्वारी, 2 हजार हेक्टर बाजरी तर सुमारे शंभर एकरच्या वर फळ पिकांचे नुकसान. कृषी खात्याच्या वतीने नुकसानीचा अहवाल जाहीर करण्यात आला. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे हाताशी आलेले पिक गेल्याची स्थिती आहे. येवला तालुक्यातील मुखेड शिवारात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे मुखेड शिवारातील टोमॅटोची शेती अक्षरशः भुईसपाट झाली. उभे असलेले पिक पूर्णपणे आडवे पडले असून अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. शेती पिकाचे इतके नुकसान होऊनही पाऊस काही थांबत नाहीये.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.