पार्थ पवारांवर छगन भुजबळ : बारामतीच्या पोटनिवडणुकीत (Baramati By Election 2026) विनंती करूनही काँग्रेस (Congress) पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून पार्थ पवार (Parth Pawar) यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले. पार्थ पवारांच्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “धड भाषणही देता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणे म्हणजे अतिशयोक्ती आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे. आता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय.
छगन भुजबळ म्हणाले की, अजितदादा 15 वर्षे काँग्रेससोबत सरकारमध्ये होते. अजितदादांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या सर्वांसोबत काम केलं. मात्र, असं असूनही काँग्रेसने जे केलं त्यामुळे पार्थ पवारांचा हा त्रागा आहे. काँग्रेसने विचार करायला हवा होता, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही काँग्रेसला विनंती करणार आहोत. शरद पवार साहेब म्हणाले फोटो लावणे चुकीचे आहे.सुप्रिया ताईंनी आधीच म्हटलं पाठिंबा आहे. त्यामुळे ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्याप्रती उपकृत भावना म्हणून फोटो लावला. रोहित पवार, युगेंद्र पवार रोज अजितदादांचे फोटो वापरतात. मग त्याचं काय करायचं? सुनेत्राताईंनी उद्धव ठाकरे, शिंदे साहेबांना फोन केले. मी आणि वळसे पाटील सिल्व्हर ओकवर जाऊन साहेबांना भेटून अर्ज दाखल करतोय असे सांगितले. त्यांनीही उमेदवारी देणार नाही, असं आम्हाला सांगितलं. खरगे साहेबांसोबत याबाबत बोलणं झालं नाही, जयराम रमेश यांच्याशी बोलणं झालं होतं, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
पार्थ पवार म्हणाले होते की, माझं कुणाशी बोलणं झालं नाही. त्यांना (काँग्रेसला) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे की, काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की, आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही. जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की, काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आणखी वाचा
आणखी वाचा