मुंबई : राजधानी मुंबईत आज 4 महत्त्वाच्या आणि मुंबईच्या (Mumbai) पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यामध्ये, मेट्रो 9 (Metro)आणि मेट्रो 2 तसेच पॉड टॅक्सी, आणि बोरीवली ते ठाणे बोगद्याचे कामही वेगाने सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या कामांना गती देण्यात आली. त्यामध्ये, मेट्रो 9 मध्ये दहिसर पूर्व ते काशिगाव ही मेट्रो सेवा सुरू करण्यात आलीय. तसेच, मेट्रो 2 बी अंतर्गत महाराष्ट्र नगर – मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूर अशा मार्गावर मेट्रो धावणार आहे.
मुंबईतील मेट्रो लाईन 2 बी याच्या उद्घाटनप्रसंगीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथील मार्गावर आपण पाच स्थानके सुरू करतोय, त्यानंतर सहा स्थानके दुसऱ्या टप्प्यात, तर तिसऱ्या टप्प्यात 8 स्थानकं सुरू होतील, हे तिन्ही टप्पे सुरु झाल्यानंतर एक कनेक्टिव्हिटी सुरु होईल. मुंबई मध्यपूर्व, पश्चिम व उत्तर दक्षिण अशी जोडणी होणार आहे. अंधेरी वांद्रे या भागाला जोडल्यावर एक कनेक्टिव्हिटी मिळेल, हार्बर लाईनला जोडणारी ही पहिली लाईन आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या स्थानकांची रचना ही सूर्यप्रकाश वापरुन कमीत कमी लाईट वापरण्यासाठी केलेली आहे, 72 लाईन असलेला सर्वात मोठा मेट्रो डेपो, मंडाले येथे तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी प्रशिक्षण देखील दिले जाईल, 2016-17 रोजी आम्ही मुंबईत सुगमता आणण्याची घोषणा केली होती. त्यात 1 तासात कुठेही जाता येईल, अशी व्यवस्था होती. आता पूर्ण जाळे तयार झाल्यानंतर पूर्ण महानगर आपण जोडू. त्यामुळे लोकल ट्रेनवरील लोड कमी होईल, 70 लाख लोक मेट्रोने प्रवास करतील. याशिवाय आपण रोड कनेक्टिव्हिटी करतोय, त्यात नॉर्थ कोस्टल रोड आहे. त्यामुळे वेस्टर्न हायवेला एक समांतर रोड तयार करतोय. आता केलेल्या टनेलमध्ये ईस्ट व वेस्ट चांगली कनेक्टिव्हिटी तयार होईल, हे सर्व प्रकल्प झाल्यानंतर देशातील सर्वात सुगम शहर हे मुंबई होईल. त्यामध्ये 40 टक्के काम हे लोकलने केले आहे, त्यामुळे हे मेक इन इंडिया आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.
आज दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प आपण हाती घेतला आहे, एलिव्हेटेड पॉड्स आहे, त्यात 6 लोक बसू शकतात. स्टेशनवर लोक असतील तर थांबेल, नाहीतर पॉड येणार नाही अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरली आहे. बीकेसी ते कुर्ला असे जोडले आहे की पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असेल. स्टेशन जवळच असल्याने लोक पायी किंवा सार्वजनिक वाहतूक वापरुन दुसरे वाहन वापरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बीकेसीचेडी कन्जेशन होईल. वरळी वांद्रे सी लिंक येथून एक टनेल बीकेसी येथे आणणार आहोत, पुढे दुसरा टनेल करून तो कोस्टल रोडला जोडला जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागणार नाही. पॉड टॅक्सी फक्त 20 महिन्यात पूर्ण करणार आहेत, त्यांनी मोठे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आहे. एमएमआरडीएला विनंती आहे की कुठे काहीही अडचणी आल्या तरी काम थांबता कामा नये. आम्हाला कॉल करा, एकही दिवस काम थांबता कामा नये. अतिशय वेगाने काम करू शकू ही यंत्रणा यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी याचा उपयोग होईल. ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील, तेवढ्या लवकर त्यांना उत्पन्न सुरु होईल, हाच त्यांच्यासाठी मोठा बोनस आहे.