भाजपचा स्थापना दिन साजरा
तारापुर, ता. ७ (बातमीदार) : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त डहाणू येथे समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेत जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे तसेच डहाणू नगर परिषद उपाध्यक्ष जगदीश राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत डहाणू बीच परिसरातील कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर साचलेला प्लॅस्टिक व इतर कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लॅस्टिकमुक्त परिसर, स्वच्छ पर्यावरण आणि टिकाऊ विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी या वेळी नमूद केले. या वेळी बोलताना खासदार डॉ. सवरा यांनी स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी कार्यकर्त्यांनी समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. बाबाजी काठोळे आणि जगदीश राजपूत यांनीही स्वच्छता उपक्रमाचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. या उपक्रमातून ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ हा संदेश देण्यात आला. मोहिमेमुळे परिसर अधिक स्वच्छ झाला असून, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.