किनारपट्टीवर कासव संवर्धनाची चळवळ बहरात
esakal April 09, 2026 09:45 PM

swt910.jpg
36299
वेंगुर्ले ः दीड ते दोन फुटांचा खड्डा करून अंड्डी घालताना कासव.
swt911.jpg
36300
अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले.

किनारपट्टीवर कासव संवर्धनाची चळवळ बहरात
सिंधुदुर्गात हजारो पिल्लांचे संवर्धन; वायंगणी बीच येथे आज कासव महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव संवर्धन चळवळ आता बऱ्यापैकी रुजली आहे. अनेक कासव संवर्धक आता किनारपट्टीवर तयार झाले आहेत. यातून गेल्या पाच - सात वर्षांत हजारो कासव पिल्लांचे संवर्धन झाले आहे.
जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या संवर्धनासाठीवन विभाग,कांदळवन विभाग, विविध संस्था सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्री कासवांमध्ये नैसर्गिकरित्या पालकत्वाचा अभाव असतो, हीच उणीव भरून काढण्यासाठी या सगळ्या यंत्रणा आता या कासवांच्या पिल्लांसाठी खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनल्या आहेत. या संवर्धन मोहिमेची जनजागृती करण्यासाठी वन विभागाने उद्या (ता. १० ) तालुक्यातील वायंगणी बीच येथे ‘कासव महोत्सवा’चे आयोजन केले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम असतो. या काळात मादी कासव शांत आणि सुरक्षित किनाऱ्याचा शोध घेऊन दीड ते दोन फुटांचा खड्डा करते आणि त्यात ८० ते १२० अंडी घालून पुन्हा समुद्रात निघून जाते. मात्र, या अंड्यांना आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना भटके कुत्रे, मुंगूस, घोरपड, साप आणि ब्राह्मणी घार यांसारख्या नैसर्गिक शत्रूंचा मोठा धोका असतो.
कांदळवन दक्षिण कोकण विभाग, मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक हंगामात स्थानिक कासव मित्रांची मानधन तत्त्वावर नेमणूक केली जाते. या मित्रांना अंडी व्यवस्थापन आणि उबवणी केंद्र चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. भरती रेषेपासून सुरक्षित ठिकाणी उबवणी केंद्रे उभारली जातात. अंड्यातून ४५ ते ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाते. उबवणी केंद्रातील तापमानावरही विशेष लक्ष दिले जाते, कारण तापमानातील बदलाचा परिणाम कासवांच्या लिंग गुणोत्तरावर होत असतो.
मालवणचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे आणि वेंगुर्ल्याचे परिमंडळ वन अधिकारी सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली वायंगणी, उभादांडा, शिरोडा वेळागर यांसारख्या किनाऱ्यांवर हजारो पिल्लांना जीवनदान देण्यात आले आहे. वायंगणी येथील सुहास तोरसकर यांच्यासारखे समर्पित कासव मित्र या मोहिमेचा कणा ठरत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गची सागरी जैवविविधता अधिक समृद्ध होत आहे, असे आवाहन कांदळवन विभागाने केले आहे.

कोट
केवळ संवर्धनच नव्हे, तर कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. २०२२ मध्ये सात मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले होते. त्यापैकी ‘बागेश्री’ नावाच्या कासवाने ३,५०० किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालत ओडिसा गाठले होते. तसेच डहाणू येथून सोडलेली ‘धवललक्ष्मी’ ही मादी ओमानच्या समुद्रापर्यंत जाऊन आली आहे. २०२५ मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ६४ मादी कासवांना मेटल टॅग लावून त्यांच्या प्रवासाची नोंद घेण्यात आली आहे.
- डॉ. गणेश मर्गज, प्राणी अभ्यासक
आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.