Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
Tv9 Marathi April 09, 2026 10:45 PM

राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.  ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.  त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.  दरम्यान, केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नव्हती. काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा योजनेचा लाभही थांबला होता. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचा विचार करूनच ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी  मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन यावेळी तटकरे यांनी केलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा केवायसीची मुदत वाढवण्यात आल्यामुळे या योजनेचा मोठा फायदा ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे, किंवा केवायसीमध्ये काही तांत्रिक चूका झाल्या आहेत, त्यांना होणार आहे. शासनाच्या  या निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेतंर्गत दर महिन्याला या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना राज्यातील महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत देखील मोठा फायदा झाला.  आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं अश्वासन देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून देण्यात आलं होतं. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन दीड वर्ष झालं आहे, परंतु अजूनही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. सन्मान निधीमध्ये कधी वाढ होणार? याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.