स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही केला जातो. ऐतिहासिक काळापासून काही मसाल्यांना सोन्यासारखे महत्त्व दिले गेले आहे. आजही बाजारात काही मसाल्यांच्या किमती या सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडे आहेत. ही किंमत केवळ मार्केटिंगमुळे नसून, त्यांच्या उत्पादनासाठी लागणारे कष्ट आणि मर्यादित उपलब्धतेमुळे आहे.
केशरला जगातील सर्वात महागडा मसाला मानले जाते. क्रोकस नावाच्या फुलांच्या नाजूक भागांपासून केशर तयार होते. एक किलो केशर मिळवण्यासाठी तब्बल लाखो फुलांची आवश्यकता असते. ही सर्व प्रक्रिया हाताने केली जाते. यामुळेच १ किलो केशराची किंमत ३ लाखांपर्यंत असू शकते.
एका विशिष्ट वनस्पतीच्या राळेपासून हिंग तयार होतो. याची लागवड आणि राळ काढण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेळखाऊ असते. भारतात शुद्धता आणि स्वरूपानुसार हिंगाचे दर १०० ते ३५,००० रुपये प्रति किलोपर्यंत असू शकतात.
आपल्या विशिष्ट सुगंधासाठी ओळखली जाणारी वेलची मसाल्यांची राणी म्हणून ओळखली जाते. वेलचीच्या लागवडीसाठी विशिष्ट हवामान लागते. तिची तोडणी पूर्णपणे हाताने करावी लागते. सध्या बाजारात वेलचीचा भाव साधारण २,८५० प्रति किलोच्या आसपास आहे.
लवंग म्हणजे प्रत्यक्षात वाळलेल्या फुलांच्या कळ्या असतात. योग्य वेळी त्यांची काढणी करणे ही एक कला आहे. प्रामुख्याने इंडोनेशियात उत्पादन होणाऱ्या लवंगांचा भाव सध्या १,३०० ते २,२९९ रुपये प्रति किलोपर्यंत आहे.
झाडाच्या सालीपासून तयार केली जाणारी सिलोन दालचिनी ही सर्वात शुद्ध आणि महाग मानली जाते. श्रीलंकेत याचे सर्वाधिक उत्पादन होते. गुणवत्तेनुसार दालचिनीचे दर ६०० ते १,५०० रुपये प्रति किलोपर्यंत असतात.