मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
Tv9 Marathi April 11, 2026 05:45 AM

अभिनेता आमिर खानचं खासगी आयुष्य एका खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याने रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं, त्यानंतर किरण रावशी दुसऱ्यांदा संसार थाटला. परंतु या दोन्ही नात्यांमध्ये त्याला घटस्फोटाचं दु:ख पचवावं लागलं. आमिरच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. गौरी स्प्रॅटला तो डेट करत असून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. जेव्हा पहिली पत्नी रीना दत्ता मुलांसोबत घरातून निघून गेली होती, तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो, एकटा पडलो होतो, असं त्याने सांगितलं. या भावनिक चढउतारांचा सामना करताना आमिरला दारूचं व्यसन लागलं होतं. त्यानंतर जवळपास वर्षभरापर्यंत तो दररोज रात्री दारू पिऊ लागला होता.

बरुण दास यांच्या ‘डुओलॉग’ या मुलाखतीत आमिर म्हणाला, “जोपर्यंत रीनाशी घटस्फोट झाला नव्हता, तोपर्यंत मी कधीच दारू प्यायलो नव्हतो. पण जेव्हा ती मुलांसोबत घर सोडून निघून गेली आणि मी एकटा पडलो, तेव्हा मात्र मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी कधीच दारू प्यायलो नव्हतो. फक्त एक-दोन चित्रपटांच्या सीनसाठी मी दारू प्यायलो होतो. घरी पाहुण्यांसाठी दारू घेतली होती, ती मीच प्यायला सुरुवात केली. तो काळ खूपच कठीण होता.”

एका मुलाखतीत आमिरने रीना दत्ताशी कमी वयात लग्न करणं ही मोठी चूक असल्याची कबुली दिली होती. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, “रीना आणि मी खूप लवकर लग्न केलं. तेव्हा मी 21 वर्षांचा आणि ती 18-19 वर्षांची होती. 21 वर्षांचा झाल्यानंतर तुम्हाला एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यानुसार 14 मार्चला मी 21 वर्षांचा झालो आणि त्यानंतर एक महिन्याची नोटीस दिली असती तर 14 एप्रिल ही तारीख असती. त्यात शनिवार-रविवारसुद्धा येत होते. रीना आणि माझं लग्न कायदेशीर पद्धतीने होण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत थांबायची गरज होती. अखेर 18 एप्रिल रोजी आम्ही लग्न गेलं. तेव्हा आम्ही फक्त चार महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होतो. त्या चार महिन्यातसुद्धा आम्ही एकमेकांसोबत खूप कमी वेळ घालवला होता. आमच्या मनात एकमेकांविषयी प्रेम खूप होतं. म्हणूनच आम्ही लग्न केलं होतं. पण आज त्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा वाटतं की लग्नासारखं मोठं पाऊल उचलताना खूप विचार करायला हवा.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.