Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने (Asha Bhosale Passes Away) संगीत क्षेत्रातील एक अष्टपैलू पर्व हरपले आहे. आशाताईंच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. “आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. त्यांच्या जाण्याने सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
आशाताईंच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीस यांनी एका रंजक प्रसंगाचा उल्लेख केला. काही काळापूर्वी ‘जागतिक रेडिओ दिना’निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि आशा भोसले एकाच मंचावर होते.
फडणवीस म्हणाले, “कार्यक्रमादरम्यान आशाताईंनी अचानक आग्रह धरला की मी गाणे गायला हवे. त्यांनी माझ्याकडून ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे गाऊन घेतले. एवढेच नाही, तर गाणे झाल्यावर त्या मिश्किलपणे म्हणाल्या होत्या, ‘पहा, मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले, त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही,” असे त्यांनी म्हटले.
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकभावना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. 1950 च्या दशकात त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केलं. O. P. Nayyar, R. D. Burman यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.
त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि Padma Vibhushan सारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.
आणखी वाचा
आणखी वाचा