कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींपैकी अनेकजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांची नावे आता समोर आली आहेत.
आज सकाळी झालेल्या अपघाताची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील तीन मुलींचाही मृत्यू झाला आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी देखील दुर्घटनेत ठार झाल्याचे समोकर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
अपघातातील मृतांची नावेराज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करत म्हटले की, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:45 वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही नम्र विनंती.
स्थानिक नागरिक आक्रमकदरम्यान, या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, अपघातग्रस्त ओम्नी टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. सध्या या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत.