आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर रंगत वाढताना दिसत आहे. त्यामुळे जय पराजयाचं गणित गुणतालिकेत प्लेऑफचं चित्र बदलताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सची या स्पर्धेत विजयी घोडदौड सुरू आहे. आता पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार रियान परागने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर या सामन्यात अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे लक्ष होतं. पण पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने त्याला चालतं केलं. त्याची विकेट पडल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला. आयपीएल स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा भोपळा आपल्या नावावर केला आहे. इतकंच काय नकोसा विक्रम आपल्या नावावर करून बसला आहे.
आयपीएल स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने अभिषेक शर्माने शिखर धवनच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. 2018 मध्ये क्वॉलिफायर 1 फेरीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शिखर धवन पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्यानंतर अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला आहे. इतकंच काय तर एका कॅलेंडर वर्षात टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्यााच नकोसा विक्रमही नोंदवला आहे. अभिषेक शर्मा 2026 या वर्षात आतापर्यंत 7 वेळा शून्यावर बाद झाला आहे. 18 डावात त्याने ही नकोशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2018 मध्ये 32 डावात 6 वेळा, संजू सॅमसने 2024 मध्ये 32 डावात 6 वेळा, गुरकीरट सिंग मन 2013 मध्ये 19 डावात 5 वेळा शून्यावर बाद झाला.
आयपीएल स्पर्धेतील सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जोफ्रा आर्चर दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. जोफ्रा आर्चरने चार वेळा अशी कामगिरी केली आहे. तर मोहम्मद शमी पहिल्याच चेंडूवर 5 वेळा विकेट काढली आहे. जोफ्रा आर्चरची या स्पर्धेतील पहिल्या चेंडूवर काढलेली दुसरी विकेट आहे. आर्चरने याच स्पर्धेत आरसीबीविरूद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट विकेट काढली होती. आर्चरने चौथ्यांदा अशी कामगिरी करत प्रवीण कुमार (3), उमेश यादव (3), ट्रेंट बोल्ट (3), लसिथ मलिंगा (3), भुवनेश्वर कुमार (3), अशोक डिंडा (3), पॅट कमिन्स (3)यांना मागे टाकलं आहे.
धावफलकावर एकही धाव नसताना राजस्थान रॉयल्सने पहिला बळी घेण्याची ही 24 वी वेळ ठरली. आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्सची सर्वोत्तम कामगिरी आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. मुंबई इंडियन्सने डावाच्या पहिल्याच चेंडूवर 22 वेळा विकेट काढली आहे. यात पहिल्याच चेंडूवर 12 वेळा विकेट काढण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.