23000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी? TCS च्या एचआरने सांगितले सत्य, वाचा…
Tv9 Marathi April 16, 2026 01:45 AM

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ही भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. TCS ने 9 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत 23000 हून अधिक घट झाल्याची माहिती समोर आली असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर आता आता TCS च्या HR विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

TCS मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या घटली

चौथ्या तिमाहीच्या निकालानुसार सध्या कंपनीत एकूण 5,84,519 कर्मचारी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 23,460 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. आयटी क्षेत्रातील इतक्या मोठ्या कंपनीत एका वर्षात एवढी घट होणे असामान्य मानले जाते, विशेषतः TCS ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कर्मचाऱ्यांची हकालपट्टी?

समोर आलेल्या या आकडेवारीमुळे ही कर्मचाऱ्यांची हकालपट्टी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) सुदीप कुन्नुमेल यांनी या बातम्यांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, मागील वर्षी केलेल्या अंतर्गत फेरबदलामुळे सुमारे 2% कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला होता. कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्यामागे एकच कारण नाही. कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली या बातम्या चुकीच्या आहेत. कंपनीने गेल्या वर्षीच 44000 फ्रेशर्सची भरती केली होती. तसेच आर्थिक वर्ष 2026 च्या शेवटीही 2356 नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी दिलेली आहे. तसेच आगामी काळात कॅम्पस मुलाखतीद्वारे 25000 कर्मचारी भरण्याची योजना आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्यामागील संभाव्य कारणे

तज्ज्ञांच्या मते, TCS मधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणे हे केवळ छाटणीमुळे नाही. Attrition (कर्मचारी स्वतःहून नोकरी सोडणे) आणि गरजेनुसार भरती धोरणात बदल ही प्रमुख कारणे आहेत. TCS आता जस्ट इम टाईम हायरिंग मॉडेलवर अधिक भर देत आहे, ज्यामध्ये प्रोजेक्टच्या गरजेनुसारच भरती केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याचे समोर आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.