Nari Shakti Vandan Bill : नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारने आणलेल्या या नारी शक्ती विधेयकावर सखोल चर्चा सुरू आहे. आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक आणण्यामागे केंद्र सरकारची भूमिका काय आहे? याबाबत सविस्तर सांगितले. तसेच आम्हाला या विधेयकाचे श्रेय घ्यायचे नाही, असेही मोदी म्हणाले. परंतु मोदी यांनी केलेल्या भाषणानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान चांगलाच गदरोळ झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने हा गोंधळ झाला. यावेळी अरविंद सावंतही चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्याने गोंधळअरविंद सावंत नारी शक्ती वंदन विधेयकावर बोलत होते. हे विधेयक आणण्यामागे सरकारचा हेतू स्वच्छ नाही, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. परंतु त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच सत्ताधारी बाकावर बसलेल्या एका खासदाराने आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर आक्षेप घेतला. आदित्य ठाकरे यांचे नाव अशा पद्धतीने घेणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यादरम्यान, अरविंद सावंत हेदेखील आक्रमक झाले. जे लोक तुरुंगात गेले, त्यांचेच नाव मी घेतले. मी जे लोक तडीपार झालेले आहेत, त्यांचे नाव मी घेऊ का? मी जर बोलायला लागलो तर गोध्रा हत्याकांडही समोर येईल, असा रोखठोक इशाराच अरविंद सावंत यांनी दिला.
कोण तडीपार होतं सांगू का?तालिका अध्यक्षांनी आदित्य ठाकरे यांचे घेतलेले नाव कामकाजातून काढून टाकले जाईल, असे सांगितले. परंतु सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने मोठा गोंधळ उडाला. मला कोणाला बदनाम करायचे असते तर मग मी एपस्टीन फाईल्सचे नाव घेऊ का. मी कोण तडीपार होतं, याबद्दल सांगू का? महिलांवरील अत्याचाराची पूर्ण यादी माझ्याकडे आहे, असे सांगत सत्ताधारी खासदारांनी मर्यादेचे उल्लंघन करू नये असे सुनावले. दरम्यान, तालिका अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर हे गोंधळ कमी झाला आणि सावंत यांनी आपले भाषण पूर्ण केले.