'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
जयदीप मेढे April 17, 2026 07:13 PM

Rahul Gandhi: भाजप आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा संभ्रम आहे. त्यांना असे वाटते की 'ते' म्हणजेच भारताचे नागरिक आहेत, पण तसे नाही. भाजप ही केवळ एक राजकीय संघटना आहे, ती म्हणजे पूर्ण 'भारत' नव्हे, भाजपने स्वतःलाच भारतीय सैन्य (Armed Forces) समजू नये. सैन्य ही देशाची वेगळी आणि स्वाभिमानी संस्था आहे. भाजपने स्वतःवरील टीका टाळण्यासाठी देश किंवा सैन्याच्या नावामागे "भ्याडपणे" लपू नये, असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल म्हणाले की, आम्ही तुमच्यावर टीका करतोय, देशावर नाही. त्यांनी सांगितले की, जेव्हा विरोधक भाजपवर टीका करतात, तेव्हा ती टीका देशावर किंवा सैन्यावर नसते, तर ती केवळ भाजप या राजकीय पक्षावर असते. 

भाषणाच्या शेवटी त्यांनी '16' या अंकाचा उल्लेख करत एक कोडे घातले आणि सांगितले की भाजपच्या सर्व समस्यांचे उत्तर या 16 अंकामध्ये दडलेले आहे, जे लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले. 

विधेयक लागू करण्यासाठी 10-15 वर्षांचा वेळ घेत आहे

हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून मतदारांचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, भाजप हे विधेयक लागू करण्यासाठी 10-15 वर्षांचा वेळ घेत आहे, जर त्यांना खरोखरच आरक्षण द्यायचे असेल तर ते आता या क्षणापासून लागू करावे, असे आव्हान त्यांनी दिले. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदे, नोकरशाही आणि न्यायपालिकेत ओबीसी, दलित किंवा आदिवासी समुदायाचे लोक कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजप या समुदायांना हिंदू म्हणते, पण त्यांना सत्तेच्या रचनेत जागा देत नाही, असा आरोप त्यांनी केला. 

सरकार जातीनिहाय जनगणनेपासून पळ काढत आहे. ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क आणि सत्तेत वाटा मिळू नये म्हणून हा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपली ताकद टिकवण्यासाठी भाजप दक्षिण भारतीय आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.