Anandraj Ambedkar on Ramdas Athawale : आता भोंदू बाबाच्या नादी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे वळण्याची गरज आहे असं म्हणत बुवाबाजीच्या मुद्यावरुन आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर देखील टीका केली. रामदास आठवले हे केवळ खासदारकी ठेवण्यासाठीच एकीची भाषा करतात असे म्हणत आनंदराज आंबेडकरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर निशाणा साधला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
पुरोगामी विचाराचा आणि सुशिक्षित असणारा महाराष्ट्र आज भोंदू बाबांकडे वळू लागला आहे. पण आता अशा बुवाबाजीच्या मागे न लागता बाबासाहेबांच्याकडे वळण्याची गरज असल्याचे वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक खरात सारख्या बुवाबाजांचे कारनामे समोर येत असताना आनंदराज आंबेडकर यांनी अशा भोंदू बाबांकडे जाणाऱ्या सुशिक्षित लोकांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जेव्हा त्यांची राज्यसभा टर्म संपत येते तेव्हाच एकीची भाषा करतात आणि दबाव टाकून आपली खासदारकी मिळवतात असा टोलाही आनंदराज आंबेडकर यांनी रामदास आठवले यांना लगावला. आज आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त पंढरपुरात आले होते, त्यावेळी बोलत होते.
आनंदराज आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. ते दलित चळवळीत एक प्रमुख राजकारणी आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतृत्व म्हणून ओळखलं जातं.