टिळकनगरमधील नाला तुंबला
तातडीने स्वच्छता करण्याची मागणी
चेंबूर, ता. २२ (बातमीदार) : टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, अद्याप त्याची साफसफाई न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कचऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा येत असून, पावसाळ्यात नाला तुंबून पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील शेल कॉलनी ते कामगारनगरदरम्यान हा मोठा नाला वाहतो. या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच नाल्याची साफसफाई न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने तातडीने लक्ष घालून नाल्याची साफसफाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडू करण्यात येत आहे.