मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील कुणबी समाजात वाढत्या लग्नखर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजाने साधेपणा स्वीकारावा, असे आवाहन कुणबी संघटनेचे सल्लागार ह.भ.प. रामभाऊ दळवी यांनी केले आहे. लग्न समारंभ हा आनंदाचा सोहळा असला तरी त्यामध्ये होणारा अवाजवी खर्च टाळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः हळदी समारंभामध्ये शक्यतो शाकाहारी जेवण ठेवावे, अनावश्यक दिखाऊपणा टाळावा आणि वेळेचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, लग्नातील विविध कार्यक्रमांमध्ये खर्चाची ठराविक मर्यादा पाळावी, अनाठायी स्पर्धा टाळावी आणि समाजात आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने विवाह सोहळे पार पाडावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. रामभाऊ दळवी यांच्या या सूचनांचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, आर्थिक शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.